Main Menu
h 2
Labels
- jk (51)
- चालू घडामोडी (20)
- टेस्ट TEST (23)
- नोकरी जाहिरात (2)
- नोकरी जाहिरात.. (32)
- महान / विशेष व्यक्ती (43)
- विज्ञान विषयावर टेस्ट (8)
- विशेष प्रश्नमंजुषा (15)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा (1)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट (8)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* (महान क्रांतिकारक, उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक)
*जन्म : २८ मे १८८३*
(भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
*मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६*
(दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके : मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
धर्म : हिंदू
प्रभाव : शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी
वडील : दामोदर विनायक सावरकर
आई : राधाबाई दामोदर सावरकर
पत्नी : यमुनाबाई विनायक सावरकर (माई)
अपत्ये : प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास
*भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.*
विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
⚜️ *चरित्र*
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९ च्या प्लेगला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असतांना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.
♨️ *सावरकरांचे जात्युच्छेदन*
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६). हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३० नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.
🐄 *गाय हा एक उपयुक्त पशू*
‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )
⛓️ *सात बेड्या*
सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.
🛕 *हिंदू महासभेचे कार्य*
रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
🗽 *सावरकर स्मारके*
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
🏤 *संस्था*
सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-
नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
वीर सावरकर मित्र मंडळ ()
वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
✍️ *मृत्युपत्र*
‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.
📚 *ग्रंथ आणि पुस्तके*
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :
अखंड सावधान असावे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग १
अंधश्रद्धा भाग २
संगीत उत्तरक्रिया
संगीत उ:शाप
ऐतिहासिक निवेदने
काळे पाणी
क्रांतिघोष
गरमा गरम चिवडा
गांधी आणि गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
जोसेफ मॅझिनी
तेजस्वी तारे
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
प्राचीन अर्वाचीन महिला
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
भाषा शुद्धी
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
माझी जन्मठेप
माझ्या आठवणी - नाशिक
माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
माझ्या आठवणी - भगूर
मोपल्यांचे बंड
रणशिंग
लंडनची बातमीपत्रे
विविध भाषणे
विविध लेख
विज्ञाननिष्ठ निबंध
शत्रूच्या शिबिरात
संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
सावरकरांची पत्रे
सावरकरांच्या कविता
स्फुट लेख
हिंदुत्व
हिंदुत्वाचे पंचप्राण
हिंदुपदपादशाही
हिंदुराष्ट्र दर्शन
क्ष - किरणें
📕 *इतिहासविषयावरील पुस्तके*
१८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही
📙 *कथा*
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
📚 *कादंबऱ्या*
काळेपाणी
मोपल्यांचे बंड अर्थात् मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.
सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.
वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
चाफेकरांचा फटका
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥
📜 *पुरस्कार*
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा.
’निनाद’ तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
✍️ *सावरकरांवर लिहिलेली पुस्तके*
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:
अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
कानिटकर, सचिन. माझे सावरकर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)
परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
(वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई
सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य.दि. फडके
क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
रत्नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर चरित्र - धनंजय कीर
सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे
🎭🎞️ *सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम*
अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)
मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)
अशोक कामटे
*अशोक कामटे*
(अतिरिक्त पोलीस कमीश्नर, मुंबई)
*जन्म: २३ फेब्रुवारी १९६५*
(चांबळी, महाराष्ट्र)
*मृत्यू : २७ नोव्हेंबर २००८*
(चौपाटी , मुंबई)
पुरस्कार : अशोक चक्र(२००९)
धर्म : हिंदू
वडील : मारुतीराव
मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती . त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला . ते एक कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी होते आणि त्यांना मुंबईचे रक्षण करताना वीरगती मिळाली . पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की ते उत्कृष्ट पैलवानही होते . जेथे मुरारबाजीसारखा वाघ छत्रपती शिवरायांना पुरंदरावर मिळाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या चांबळी गावचे हे सुपुत्र.
या गावात कुस्तीची परंपरा आहे. कामटे याचे वडील कर्नत होते व ते कुस्तीच्या खेळातूनच लष्करात भरती झाले होते. तर आजोबा पोलीस अधिकारी होते . अशोक कामटे यानी अनेक नामाकित पैलवानांना अस्मान दाखविले होते . कोडाईकनातव्या इंटरनेशनल स्कूलमधून कामटे याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले , तर पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात झाते . त्याना आतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती , मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यानी पदवी प्राप्त केली , तर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात एमए पूर्ण केले . त्याना कॅम्प रायझिंग सन मधून आतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1992 मध्ये उत्तीर्ण झाले . पेरू येथे झालेल्या ज्युनिअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत 1978 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते .
अशोक कामटे हे पोलीस दलामध्ये बॉडी बिल्डर म्हणून प्रसिद्ध होते . त्यांनी बंधकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते . मुंबई हल्ल्याच्या वेळी ते मुंबईच्या पूर्व विभागात ड्युटीवर होते . त्यामुळे त्यांना कामा हॉस्पिटल कारवाईसाठी इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. कामटे हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते . त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा , सातारा , ठाणे ग्रामीण येथे काम केले . वर्ष 1999 ते 2000 या कालावधीत युएनमिशन बोस्निया येथे प्रतिनियुक्तीवर होते . वर्ष 2000 मधे डेपुटी कमिशनर पोलीस मुंबई म्हणून नेमणूक झाली . त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर येथे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर नेमणूक झाली . त्यांनी वर्ष 2008 मधे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यभार स्वीकारला आणि पाचच महिन्यात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले .
त्यांच्या पत्नी विनिता कामटे ( सहलेखिका विनिता देशमुख ) यांनी " टु द लास्ट बुलेट ' या पुस्तकात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत , अखेरचा प्रवास या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अंतिम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे . विनीता कामटे लिहितात - माझे सासरे तर दुःखाने पूर्ण कोलमडले होते . पण तेही एक लष्करी अधिकारी होते अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली . तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल . अशा कर्तव्य दक्ष अशोकास 2009 मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
*जयहिंद*
बँक ऑफ बडौदा (BOB) ने 4000 पदांवर अप्रेंटिसची भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडौदा (BOB) ने 4000 पदांवर अप्रेंटिसची भरती जाहीर केली आहे.
बँकाच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 अर्ज सुरू झाली आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया सूर झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे.
बँक ऑफ बडोदा च्या या भर्तीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी (ग्रॅज्युएशन) संपन्न केलेली असावी.
तसेच, उमेदवारांना NAPS किंवा NATS मध्ये नोंदणी करणे देखील आवश्यक आहे. BOB Apprentice Recruitment 2025 Notification PDF उमेदवार योग्यता संबंधित संपूर्ण माहिती तपासू शकतात.
राणी चेन्नम्मा
🏇 *राणी चेन्नम्मा* 🤺
*जन्म : 23 आॕक्टोबर 1778*
*(बेलगाम, कर्नाटक)*
*वीरमरण : 21 फेब्रुवारी 1829*
*(बैलहोंगल)*
कित्तूरची राणी चेन्नम्मा दक्षिण भारतातील झाशीची राणी लक्ष्मीबाईच समजली जाते. राणी लक्ष्मीबाई इतकाच तिचा देशाभिमान जाज्ज्वल्य होता. या अत्यंत सुदंरीचा जन्म काकतीय वंशातील देसाई घराण्यात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव धुलाप्पा देसाई व आईचे नाव पदमावती होते. ती अपरूप सुंदरी असल्यानेच त्या अर्थाचे तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले. बालपणापासूनच ती अत्यंत स्वाभिमानी बाणेदार होती. शिक्षणातही तिला अत्यंत रस होता. कन्नड, मराठी, उर्दू व संस्कृत या चार भाषांचे ज्ञान तिने किशोर वयात येण्या आधीच प्राप्त करून घेतले होते. त्याचप्रमाणे घोडेस्वारी व शस्त्रविद्येतही ती प्रवीण झाली होती. कित्तूरचा राजा मल्लराज एकदा शिकारीला गेला असताना त्याने चेन्नम्माला वाघाची शिकार करतना पाहिले. तिचा पराक्रम व रूपलावण्य पाहून त्याने धुलाप्पा देसाई यांच्याकडे चेन्नम्माशी विवाह करण्याची मागणी घातली. मल्लसर्जचा विवाह आधी रुद्रव्वा हिच्याशी झालेला होता. धुल्लाप्पा देसाईना हे स्थळ आवडले व त्यांनी चेन्नम्माचा विवाह मल्लसर्ज राजाशी करून दिला. विवाहानंतर चेन्नम्मा ही बुद्धिमान, विद्वान, चतुर व धोरणी असल्याचे राजा मल्लसर्जांच्या लक्षात आले. तो राज्यकारभाराविषयी चेन्नम्माशी विचारविनिमय करू लागला.
पुणे - बंगलोर मार्गावर बेळगावपासून पाच मैल अंतरावर कित्तूरनगर व कित्तूरचा किल्ला आहे. राजा मल्लसर्च्या कारकीर्दीत कित्तूर राज्य वैभवसंपन्न होते. राज्यात ७२ किल्ले व ३५८ गावे होती. कित्तूर नगरी व्यापाराचे मोठे केंद्र होती. सोने, चांदी, जड-जवाहीरांचा व्यापार तेथे चालायचा. दूर-दूरचे व्यापारी कित्तूरला यायचे. राज्यातील जमीनही अत्यंत सुपीक असल्याने शेतीचे उत्पन्नही फार मोठे होते.
राजा मलसर्ज मोठा वीर, पराक्रमी व मानी होता. प्रजेवर त्याचे अत्यंत प्रेम होते, त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधाने व आनंदाने जगत होती. तो विद्याप्रेमी व कलासक्त होता. त्याच्या दरबारी नेहमी मोठमोठे पंडित व कलावंत येत असत. त्यांचा मान तो ठेवीत असे व त्यांना भरघोस बिदागीही देत असे.
राजा मल्लसर्जचे आपल्या दोन्ही राण्यांवर प्रेम होते. तो त्यांचा मान ठेवूनच त्यांच्याशी वागायचा . रूद्रव्वा ही धार्मिक वृत्तीची, शांत स्वभावाची व समंजस होती. राणी चेन्नन्मा तिला आपली मोठी बहीणच मानायची. दोन्ही राण्यांनी एक एक पुत्राला जन्म दिला होता. पण चेन्नम्माचा पुत्र बालपणीच वारला. रुद्रव्वाच्या पुत्राचे नाव शिवालिंग रुद्रसर्ज होते. राणी चेन्नमाचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते.
राजा मल्लसर्जचा प्रधान गुरुसिद्दप्पा हा मोठा विचारी, धोरणी व राजव्यवहारकुशल होता. आपल्या राज्याचा हिताचा विचार करूनच तो राजाला सल्ला द्यायचा. त्याची सत्तरी उलटून गेली होती. तरीही तो आपल्या राज्याचा काराभार चोखपणे बजवायचा पण मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय हे दोन्ही मंत्री कारस्थानी होते. मल्लप्पाशेट्टीचा डोळा राज्याच्या प्रधानपदावर होता. गुरुसिद्दप्पा प्रधानपदावरून निवृत्त कधी होतो व त्याचे प्रधानपद आपल्याला केव्हा मिळते, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा पण गुरुसिद्दप्पावर कितूरच्या प्रजेची श्रद्धा होती. त्यामुळे हे दोघे मंत्री काहीही करु शकत नव्हते.
दुसरा बाजीराव पेशवा याने १८०२ साली वसईला इंग्रजांशी तह करून मराठा राज्य इंग्रजांकडे गहाण टाकले व तो इंग्रजांच्या अधीन होऊन कारभार करु लागला. तो अतिशय कामुक व लोभी होता. त्याने जनतेवर अत्याचार करून सरदारांना त्रासवून सोडून संपत्ती गोळा करण्याचे सत्रच सुरु केले होते. आता त्याची नजर कितूरच्या संपन्न राज्याकडे वळली, तो आपले सैन्य घेऊन कृष्णा नदीकाठी यडूर येथे आपली छावणी देऊन राहिला होता. त्याने राजा मल्लसर्ज याला आपल्या भेटीसाठी निरोप पाठविला. त्याप्रमाणे राजा मल्लसर्ज गुरूसिद्दप्पाच्या सल्ल्याने त्याच्या भेटीस गेला. बाजीराव त्याच्यासह पुण्यास गेला व त्याने राजा मल्लसर्ज यालाही पुण्यास नेऊन कैदेत ठेवले.
एक आठवडा होऊन गेला तरीही राजा मल्लसर्ज कित्तूरला परत आला नाही. म्हणून राणी चेन्नम्माने गुरसिद्दप्पाला येडूरला पाठविले. गुरुसिद्दप्पा येडूरला पोचला, तेव्हा तेथे पेशव्यांची छावणी नव्हती. त्याला समजले की, बाजीराव मल्लसर्जला घेऊन पुण्यास निघून गेला आहे. गुरुसिद्दप्पा पुण्याला गेला. त्याने बाजीरावाशी बोलणी केली. पेशव्यांना दरवर्षी १ लाख ७५ हजार रूपये खंडणी देण्याच्या अटीवर बाजीरावने राजा मल्लसर्ज याला कैदेतून सोडून गुरुसिद्दप्पा याच्या हवाली केले. त्यावेळी राजा मल्लसर्ज याची प्रकृती अतिशय खंगलेली होती. तो कैदेत असताना बाजीरावाने त्याचे खूप हाल केले होते व त्याला अन्नातून विषही चारले होते. त्यामुळे राजा मल्लसर्ज अतिशय दुर्बल झाला होता. वास्तविक पाहता मल्लसंर्जाने पेशव्यांविरूद्ध काहीही केलेले नव्हते. पण धनलोभापायी बाजीरावाने हे नीचकर्म केले होते.
कितूरला आल्यावर मल्लसर्जची तब्येत अधिकच खालावली. त्याचे वय त्यावेळी अवघे ३४ वर्षांचे होते. आता त्याला जगण्याची आशा वाटत नव्हती, त्याने गुरुसिद्दप्पाला बोलावून तसे सांगितले व राज्याचा भार त्याच्यावर व राणी चेन्नम्मावर सोपवून त्याने डोळे मिटले. राज्यातील प्रजा दुःखाने 'हाय हाय' करू लागली. दोन्ही राण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुसिद्दप्पाने दोन्ही राण्यांचे सांत्वन केले. राणी चेन्नम्मा हिने रुद्रव्वाचा पुत्र शिवलिंग रूद्रसर्ज याला युवराजपदी बसवून राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. गुरुसिद्दप्पाने कठीण प्रसंग ओळखून राणी चेन्नम्माला चांगली साथ दिली. परंतु ११ सप्टेंबर १८२४ साली शिवलिंग रुद्रसर्ज याचे दुर्दैवाने निधन झाले. राजवाड्यावर शोककळा पसरली.
राणी चेन्नमाने राजाच्या संबंधातील मास्त मरडीगोंडा याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव
'गुरूलिंग मल्लसर्ज ' असे ठेवले. मल्लप्पाशेट्टी याच्या दृष्ट बुध्दीला हे मानवले नाही. त्याने धारवाड येथे जाऊन तेथला इंग्रज कलेक्टर थॕकरे यांची भेट घेतली व राणी चेन्नम्माने दत्तक घेणे बेकायदेशीर आहे, असे त्याला सांगितले. कारण आता त्याचा हेतू कित्तूरचे राज्य बळकावण्याचा होता. वास्तविक पाहता दत्तक समारंभाच्या वेळी कित्तूर येथील इंग्रज प्रतिनिधींनाही राणी चेन्नम्मा व गुरुसिद्दप्पा यांनी उपस्थित ठेवले नव्हते. तेव्हा त्यांनी दत्तक घेण्याबद्दल कसलाही आक्षेप घेतला नव्हता.
आता थॕकरेच्या मनात कित्तूरचे राज्य बळकावण्याचा विचार घर करून बसला. त्याला माहीत होते की, कित्तुरला अलोट संपत्ती आहे. मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे कित्तूरचे मंत्री त्याला साथ देऊ लागले. या दोघांनी थॕकरे याला सर्व सहाय्य करण्याचे वचन दिले आणि त्यांनी थॕकरे याला असेही सांगितले की, " जोपर्यंत राणी चेन्नम्मा जिवंत आहे, तो पर्यंत कित्तूरवर कब्जा करणे शक्य नाही." म्हणजे हे दोघे देशद्रोही राणी चेन्नम्माच्या जिवावरच उठले होते, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते.
थॕकरे याने एका पत्रान्वये राणीला कळविले की, '"तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दत्तक का घेतला ? आम्ही तुमच्या या दत्तकाला परवानगी देणार नाही. असे तुमचा मंत्री मल्लप्पाशेट्टी याने तुम्हाला सांगितले असतांनाही तुम्ही दत्तक घेतला. तो आम्हास मंजूर नाही. तुम्ही राज्याचा कारभार मल्लप्पाशेट्टीकडे सोपवावा."
राणीने थॕकरेच्या या पत्राला कवडीइतकीही किंमत दिली नाही, आता युद्ध अटळ आहे, हे तिला व गुरुसिद्दप्पाला कळून चुकले. त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. आपल्या राज्यातील जनतेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे व सैन्यात तरुण वीरांनी सामील होण्याचे आवाहन केले. शेकडो तरूण वीर युद्धासाठी तयार झाले. राणीच्या पाठीशी प्रधान गुरूसिद्दप्पा तसेच रायण्णा, बालण्णा, गजवीर आणि चेन्नबसप्पा असे अनेक वीर उभे राहिले. राणीने गुरूसिद्दप्पाशी विचार-विनिमय करून थॕकरेला एक पत्र देऊन कळविले
की, "कित्तूर एक स्वतंत्र राज्य आहे व ते स्वतंत्रच राहील. याची जाणीव ठेवावी. जर तुम्हाला युद्ध करायचे असेल, तर आम्हीही युध्दासाठी तयार आहोत. अशी तुमच्यासारख्यांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करु, पण शरण जाणार नाही."
राणीचे हे बाणेदार उत्तर वाचताच थॕकरेच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आपले सैन्य घेऊन तो कित्तूरच्या किल्ल्याबाहेर येऊन ठाकला. २१ ऑक्टोबर १८२४ रोजी त्याने राणीला निरोप पाठविला की, "तुम्ही तुमच्या प्रधानांसह आम्हास येऊन भेटावे,
"राणीने भेटण्यास नकार दिला व किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर कडा पहारे बसविले. प्रत्येक बुरुजांवर तोफांची मोर्चेबांधणी केली. राणीची सगळी युद्धाची तयारी व किल्ल्याची सर्व माहिती मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांनी थॕकरेला सांगितली. मल्लप्पा शेट्टीने राणीच्या पाकशाळेच्या प्रमुख बाईला पैशांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि राणीला खिरीतून विष देण्यास सांगितले. राणीला हे आपल्या गुप्तहेरांकरवी आदल्या दिवशीच कळले होते. दुस-या दिवशी राणी जेवायला बसली, तेव्हा तिने त्या बाईचे पानही आपल्यासमोर वाढायला सांगितले व माझ्याबरोबर तू ही जेव, अशी आज्ञा तिला केली. ती बाई लटलटा कापू लागली. तिचा चेहरा पांढराफटक पडला व ती जेवायला नकार देऊ लागली. तेव्हा राणीने आपल्या स्त्री सैनिकांकरवी ती खीर तिला खायला लावली. थोडयाच वेळात तिचे शरीर काळे निळे पडले, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मल्लप्पाशेट्टीने मला हे कृत्य करायला लावले.'
युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा सुरु झाला. बंदुकीच्या गोळीबारांनी आकाश दुमदुमून गेले. कित्तूरचा प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढत होता. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजाकडचे अनेक युद्धकैदी पकडले गेले. त्यात मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे सुद्धा होते, त्यांना तुरूंगात डांबण्यात येऊन तुरूंगावर विश्वासू सैनिकांचा कडक पहारा बसविला. दुस-या दिवशी पुन्हा युद्ध अधिक जोमाने सुरू झाले. थॕकरेला आपल्या पराभवाची कल्पना येऊ लागली. राणी स्वतः लढत होती. ती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपला विजय होणं अशक्य आहे, हे त्याने हेरले व अचुक नेम धरून राणीवर बंदुकीने गोळी झाडली. तिच्या अंगरक्षकाने ती गोळी आपल्या छातीवर घेतली व तो धाडकन खाली पडला. हे पाहताच राणीने एकाच गोळीत थॕकरेला त्याच्या घोड्यावरून उडवून लावले. थॕकरे ठार झाल्यावर इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण उडाली. अनेक इंग्रज सैनिक कित्तूरच्या वीरांनी कापून काढले. अनेक वाट फुटेल तिकडे पळून गेले .
देशद्रोही मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांना बेड्या घालून राणीने दरबारात आणविले. मंत्री मंडळाच्या सल्ल्यावरुन त्यांना हत्तींच्या पायी तुडविण्यात आले. त्यांच्याबरोबरच स्टिव्हनसन व इलियट हे दोन इंग्रज अधिकारी पकडले होते." युद्ध पूर्णपणे बंद कराल, तर या दोन्ही अधिका-यांना सोडून देण्यात येईल, असा निरोप राणीने इंग्रजकडे पाठविला. या दोघांना सोडून दिले, तर युद्ध करणार नाही, असे प्रत्युत्तर छावणीतील इंग्रज अधिका-यांनी राणीकडे पाठविले. त्यावर विश्वास ठेवून राणीने त्या दोन्ही इंग्रज कैद्यांना सोडून दिले. इंग्रज हे विश्वासघातकी व शब्दाला न जागणारी जमात आहे, हे राणीला माहित नव्हते.
कित्तूरच्या पराभवाचे वृत्त समजताच दक्षिण हिंदुस्थानचा कमिशनर चॕपलिन, कॕ.जेम्सन व कॕ. स्पिलर घोडेस्वारांची मोठी सेना घेऊन ३० नोव्हेंबर १८२४ रोजी कित्तूरच्या किल्ल्यावर चालून आले. त्यांनी किल्ल्याला वेढा दिला. त्याच रात्री कित्तूरचा किल्लेदार शिवबसप्पा कमिशनरला भेटला व त्याने या युद्धात मदत करण्याचे आश्वासन चॕपलिनला दिले. तेव्हा "याच्या मोबदल्यात तुला काय हवे आहे ?" असा प्रश्न चॅपलीनने त्याला केला. शिवबसप्पाने उत्तर दिले,
"कित्तूरचे राज्य" 'ठिक आहे', असे म्हणून चॅपलीनने त्याला निरोप दिला. शिवबसप्पाने लगेच कित्तूरच्या किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याची सर्व माहिती चॕपलिनला दिली. व तो परत किल्ल्यात आला.
स्टिव्हनसन व इलियट इंग्रज छावणीत परतले. लगेच २ डिसेंबर १८२४ रोजी चॕपलीनने युद्धाची घोषणा केली. कर्नल वॉकर व कर्नल डिकन्स हे आपल्या फौजा घेऊन कित्तूरच्या राज्यात शिरले. आणि कित्तूरच्या आसपासचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. कित्तुरवर इंग्रजांनी चहुबाजुनी हल्ला केला. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ४ डिसेंबरला इंग्रजांनी कित्तूरच्या तटावर तोफगोळयांचा मारा सातत्याने केला. तटाला भगदाड पडले. राणीकडे १८ पौंडी व ६ पौंडी गोळे फेकणा-या उत्तम तोफा होत्या. पण त्या तोफांतून दारुगोळाच उडेना. गुरुसिद्दप्पांनी तपास केला. किल्लेदार शिवबसप्पाने दारुच्या कोठारातील दारुत बाजरी व शेण मिसळून ठेवले होते. तो दारुगोळा त्यामुळे निकामा झाला होता. गुरुसिद्दप्पाने राणीला सल्ला दिला की,
"आता किल्ला सोडून जाणेच श्रेयस्कर आहे ." पण राणी माघार घ्यायला तयार नव्हती. तरीही स्वामिभक्त गुरुसिद्दपाने तिला किल्ल्याबाहेर पडण्यारा राजी केले. तिलाही ते पटले. त्याच रात्री गुप्तमागनि राणी चेनम्मा, राणी रुद्रव्वा, छोटा राजा, वीरव्वा आणि शिवलिंगव्वा किल्ल्याबाहेर पडले. त्यांना तात्काळ इंग्रज सैन्याने गिरप्तार केले. युद्ध बंद झाले. कित्तूरच्या किल्ल्यावर इंग्रजांचे
युनियन जॅक फडकू लागले. गुरुसिद्दप्पा, सैदनसाहेब पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना कित्तूरच्या चौकात फाशी दिली.
राणी चेन्नम्माला व तिच्या राज परिवाराला बैलहोंगलच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. त्या तुरुंगातून कित्तूरवर फडकणारे इंग्रजांचे युनियन जैक पाहून तिच्या अंतःकरणात भयंकर वेदना उठत असत. कित्तूर परतंत्र झाल्याचे भयानक दुःख सहन करीत ती जगायचे म्हणून जगत होती. राज परिवाराचे लोक तिच्या सोबतीला होते. हाच फक्त तिला दिलासा होता. इंग्रजांनी तोही हिरावून घेतला. राणी रुद्रव्वासह सगळया राज परिवाराला कुसुगलच्या तुरुंगात इंग्रजांनी पाठवून दिले. राणी आता बैलहोंगलच्या किल्ल्यात एकटीच कडक पहा-यात होती. एकांतातले जिणे तिला असहय झाले. तेव्हा तिचा वेळ शिवलिंगाची पूजा करण्यातच व्यतीत होऊ लागला. तिने आपला आहारही कमी करुन टाकला.
शेवटच्या युद्धात कित्तूरचे स्वामिभक्त वीर रायण्णा व बालण्णा हे निसटून जंगलात निघून गेले होते. त्यांनी कित्तूर जिंकण्याचा चंग बांधला. कित्तूर राज्यातील गावागावातून तरुण वीर गोळा करुन आपले सैन्य उभारले. सुरपूरच्या व शिवगुत्तीच्या राजांनाही रायण्णाने पटवून दिले की, "कित्तूर इंग्रजांच्या ताब्यात राहिले , तर तुमचे राज्यही इंग्रज बळकावतील. म्हणून तुम्ही आपल्या सैन्यासह या व कित्तूर स्वतंत्र करण्यास मदत करा." त्या राजांनाही ते पटले. आपल्या सैन्यासह ते रायण्णाला येऊन मिळाले. ते सैन्य चार मैलापर्यंत पसरले पाहून इंग्रजच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी काही फितूर मिळविले. त्या फितुरांनी रायण्णा नदीत आंघोळ करीत असतांना त्याला पकडले व इंग्रजांच्या हवाली केले. रायण्णाला धारवाड येथे नेऊन फाशी देण्यात आले. कित्तूरवर चालून आलेल्या सैन्यातही इंग्रजांनी फूट पाडली व तिचा पराभव केला.
कित्तूरचा किल्लेदार इंग्रज कमिशनरला मोठया आशेने भेटला व त्याने ठरल्याप्रमाणे कित्तूरच्या राज्याची मागणी चॕपलीनकडे केली. तेव्हा चॕपलीन त्याला म्हणाला, "ठीक आहे. इंग्लंडमध्ये देशद्रोह करणा-यांना जे बक्षीस देण्यात येते, तेच तुम्हांला देऊ" लगेच शिवबसप्पाच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. कित्तूरमध्ये गाढवावरुन त्याची धिंड इंग्रजांनी काढली व नंतर त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले.
रायण्णाला फाशी दिल्याची बातमी राणी चेन्नमाला समजली. ती ऐकताच ती मुर्च्छित झाली. डॉक्टरला बोलावण्यात आले. आधीच तिने अन्नत्याग केला होता. डाॕक्टर म्हणाला,
"आता हिच्या जगण्याची आशा नाही." थोड्याच वेळात स्वातंत्र्यासाठी तडफणारा राणीचा आत्मा अनंतात निघून गेला. कित्तूरचा प्राणच नाहीसा झाला. ही बातमी राणी रुद्रव्वा, वीरव्वा आणि नवा दत्तकराजा गुरुलिंग मल्लसर्ज यांना कळली. तेव्हा त्यांचा आकांत काय वर्णावा? त्या तिघांनी आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊन तुरुंगात प्राणत्याग केला. संपली ! राणी चेन्नम्माच्या स्वातंत्र्य लढण्याची कहाणीची इतिश्री झाली ! त्या थोर क्रांतिकारक राणीला कर्नाटकच काय पण सारा भारत कधीही विसरणार नाही.
त्यांच्या सन्मानार्थ २२ ते २४ आॕक्टोबरला कित्तुर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवी दिल्ली येथिल पार्लमेंट हाऊस मध्ये राणी चेन्नम्मा यांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
त्यांचे जीवन नारी शक्तीची प्रतिकच नाही तर प्रेरणास्त्रोत सुध्दा आहे. आपल्या शर्थीनुसार जीवन जगायला कोणतेही मूल्य कमी पडते.
छत्रपती शिवाजी महाराज
*छत्रपती शिवाजी महाराज*
*(मराठी साम्राज्याचे संस्थापक)*
पूर्ण नाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
*जन्म : १९ फेब्रुवारी १६३०*
(शिवनेरी किल्ला, महाराष्ट्र)
*मृत्यू : ३ एप्रिल १६८०*
(रायगड किल्ला, महाराष्ट्र)
अधिकारकाळ : ६ जून १६७४ - ३ एप्रिल १६८०
अधिकारारोहण : छत्रपती पदाभिषेक
राज्याभिषेक : ६ जून १६७४
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
राजधानी: रायगड
उत्तराधिकारी : छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील : शहाजीराजे भोसले
आई : जिजाबाई
पत्नी : सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंतीबाई
संतती : छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले,
सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई, राजकुवरबाई, दीपाबाई, कमळाबाई
राजघराणे : भोसले
राजब्रीदवाक्य : 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन : होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)
शिवाजी शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.
प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.
शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.
🤴🏻 *प्रारंभिक जीवन*
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे.
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवाछ केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला.
🌀 *पार्श्वभूमी आणि संदर्भ*
इ.स. १६३६ मध्ये विजापूरच्या आदिल शाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजीराजे त्यावेळीपश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते.
शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले.
१६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १६४७ मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले.
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
♨️ *विजापूर सल्तनतीशी संघर्ष*
इ.स. १६४६ मध्ये, सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती.
यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाईची करण्याचे ठरवले. २५ जुलै १६४८ रोजी, शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले.
१६४९ मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. १६४९ - १६५५ दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि १६५६ मध्ये, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्याच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. १६६४ - १६६५ मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला.
🤺 *अफझलखानाशी लढा*
शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. १६५७ मध्ये सुलतानने, किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने, अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजा भवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली.
विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले.
दोन्ही सैन्याने आपापसांत अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफझलखानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यांनंतर अफझलखानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले.
अफझलखान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती. याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपतलपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील ३,००० हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैदी झाले. विजयानंतर, प्रतापगडच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूंपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीसे देण्यात आली.
अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापुरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
🏰 *पन्हाळ्याचा वेढा*
विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि १६५९ मध्ये रुस्तम जमान आणि फझलखान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. मुघलांशी युती करून १६६० मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जौहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जौहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. १६६० च्या मध्यात सिद्दी जौहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला.
पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जौहरने राजापूर येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडिमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्यांची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांन समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याची बदला घेतला आणि चार इंग्रजांना पकडले व त्यांना १६६३ च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले.
अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटी केल्या आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला; १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला.
💥 *पावनखिंडीची लढाई*
रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला असता, बांदल देशमुखचे मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे हे ३०० सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले. यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याची संधी मिळाली.
पावनखिंडच्या लढाईत लहान मराठा सैन्याने मोठ्या शत्रूला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळी बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले होते तरीही विशाळगडावरून तोफगोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोचल्याचे संकेत होता. घोड खिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे, शिबोसिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावन खिंड ("पवित्र खिंड") असे नामकरण करण्यात आले.
🔥 *मुघल साम्राज्याशी संघर्ष*
१६५७ पर्यंत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी शांततापूर्ण संबंध ठेवले होते. मुघल सम्राटाचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता, तेव्हा त्याला विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली मदत देऊ केली होती. याच्या बदल्यात शिवरायांच्या ताब्यातील विजापुरी किल्ले आणि गावांवर त्यांचा हक्क मान्य करावा, अशी त्यांची इच्छा होती. मुघलांच्या प्रतिसादाने समाधानी झाले नसल्याने आणि विजापूरकडून चांगली ऑफर मिळाल्याने, त्यांनी मुघलांच्या दख्खनवर हल्ला केला. मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च १६५७ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल प्रदेशावर छापा टाकला. यानंतर जुन्नरवर छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांनी 300,000 हून एवढी रोख रक्कम आणि 200 घोडे घेतले. औरंगजेबाने नासिरी खानला पाठवून या छाप्याला उत्तर दिले. नासिरी खानाने अहमदनगर येथे मराठी सैन्याचा पराभव केला. तथापि पावसाळ्यामुळे आणि सम्राट शाहजहानच्या आजारपणानंतर मुघल सिंहासनासाठी भावांसोबतच्या उत्तराधिकारासाठी लढाईमुळे औरंगजेबाला शिवरायांविरुद्धच्या प्रतिकारांमध्ये व्यत्यय आला.
🤺 *शाहिस्तेखान प्रकरण*
आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी १६६० मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी १,५०,००० हून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. खानासोबत सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखालील विजापूरचे सैन्य देखील होते. शाइस्ताखानाने आपल्या ८०,००० इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे ताब्यात घेतले. त्याने जवळचा चाकणचा किल्लाही घेतला. किल्ल्याच्या भिंतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेढा घातला होता. शाइस्ताखानने मोठे, चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले.
५ एप्रिल १६६३ च्या रात्री शिवरायांनी शाईस्ताखानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला. लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन ४०० माणसांसह शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या शयनगृहात घुसले. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या हल्ल्यात शाइस्ता खानचा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नोकर आणि सैनिक मारले गेले. खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये बदली केली.
शाइस्ताखानाच्या हल्ल्यांचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेला खजिना भरून काढण्यासाठी १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लूटले.
💰 *सुरतेची पहिली लूट*
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
🏳️ *पुरंदरचा तह*
शाहिस्तेखान आणि सुरतेवरील हल्ल्यांमुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे १५,००० सैन्यासह पाठवले. १६६५ मध्ये, जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंगच्या घोडदळांनी ग्रामीण भाग उद्ध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्ल्यांना वेढे घातले. हा मुघल सेनापती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतींना आणि त्यांच्या अनेक घोडदळांना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला. १६६५ च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगशी करार करणे भाग पडले.
११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात, शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले, १२ स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना ४,००,००० सोन्याचे हूण इतकी भरपाई दिली. शिवरायांनी मुघल साम्राज्याचा जामीनदार बनण्यास आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारांसह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्यासाठी मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शविली.
🏰 *आग्रा भेट*
शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात
१६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले (काही दस्ताऐवजांनुसार दिल्लीमध्ये बोलावले होते.) मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि, दरबारात १२ मे १६६६ रोजी, शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले. यापैकी काहींना त्यांनी युद्धात आधीच पराभूत केले होते. शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले. यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग याने शिवाजी आणि त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्याची हमी दिली.
शिवाजी महाराजांसाठी नजरकैदेत असलेली स्थिती धोक्याची होती, कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता. जयसिंगने शिवाजीराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते. म्हणून त्याने औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवाजीराजांनी स्वतःला मुक्त करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी परत पाठवले आणि रामसिंगला त्याने सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितली आणि स्वतःला मुघल सैन्याच्या स्वाधीन केले. तेव्हा शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गरिबांना प्रायश्चित्त म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात. पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः एका मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले.
कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
🔮 *मुघलांसोबत शांतता*
शिवरायांच्या सुटकेनंतर मुघल सरदार जसवंत सिंग याने नवीन शांतता प्रस्तावासाठी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यानंतर मुघलांशी शत्रुत्व कमी झाले. १६६६ ते १६६८ दरम्यान, औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केली. तसेच संभाजीला पुन्हा एकदा ५,००० घोड्यांसह मुघल मनसबदार करण्यात आले. त्यावेळी शिवाजीराजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासमवेत औरंगाबाद येथे मुघल सुभेदार मुअज्जम (पहिला बहादूरशहा) याच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले. संभाजीला बेरारमध्ये महसूल वसुलीसाठी प्रदेश देण्यात आला.
औरंगजेबाने शिवाजीराजांना कमजोर होत चाललेल्या आदिलशाहीवर हल्ला करण्याची परवानगी दिली; कमकुवत झालेला सुलतान अली आदिल शाह दुसरा याने शांततेसाठी प्रस्ताव दिला आणि शिवाजी महाराजांना सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकार दिले.
🚩 *पुनर्विजय*
शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील शांतता १६७० पर्यंत टिकली. त्या वेळी औरंगजेबाला शिवाजीराजे आणि मुअज्जम यांच्यातील घनिष्ट संबंधांबद्दल संशय आला, जो त्याचे सिंहासन बळकावू शकेल असे त्याला वाटले. तो शिवाजीराजांकडून लाचही घेत असावा, असाही औरंगजेबाला संशय होता तसेच त्या वेळी, औरंगजेबाने अफगाणांशी लढाई केली. त्यासाठी त्याने दख्खनमधील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी केले; परिणामी बरखास्त झालेले बरेच सैनिक मराठ्यांच्या सेवेत त्वरीत रुजू झाले. मुघलांनी काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बेरारची जहागीरही काढून घेतली. प्रत्युत्तर म्हणून शिवाजीराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमण सुरू केले आणि चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना शरण आलेल्या प्रदेशाचा एक मोठा भाग परत मिळवला.
१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लूटले. यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांचा हल्ला परतवून लावू शकले, परंतु मक्केहून परत आलेल्या मावरा-उन-नाहर येथील मुस्लिम राजपुत्राचा माल लुटण्यासह त्यांनी शहरच उद्ध्वस्त केले. नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या मुघलांनी मराठ्यांशी पुन्हा शत्रुत्व सुरू केले. मुघलांनी शिवाजीराजांना सुरतहून घरी परतल्यावर अडवण्यासाठी दाऊद खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले; परंतु सध्याच्या नाशिकजवळील वणी-दिंडोरीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला.
ऑक्टोबर १६७० मध्ये, शिवाजीराजांनी आपले सैन्य मुंबईत इंग्रजांना त्रास देण्यासाठी पाठवले. कारण इंग्रजांनी त्यांना युद्धसामग्री विकण्यास नकार दिला होता. त्यांच्या सैन्याने लाकूड तोडणाऱ्या इंग्रज लोकांना मुंबई सोडण्यापासून रोखले. सप्टेंबर १६७१ मध्ये, शिवाजीराजांनी दांडा-राजपुरी विरुद्धच्या लढाईसाठी पुन्हा एकदा साहित्य मागवण्यासाठी मुंबईत राजदूत पाठवले. या विजयामुळे मराठ्यांना किती फायदे होतील याची इंग्रजांना शंका होती, परंतु राजापूरचे कारखाने लुटल्याची भरपाई मिळण्याची एकही संधी ते गमावू इच्छित नव्हते. इंग्रजांनी लेफ्टनंट स्टीफन उस्टिकला शिवाजीशी बोलणी करण्यासाठी पाठवले, परंतु राजापूर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर वाटाघाटी अयशस्वी झाल्या. १६७४ मध्ये शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यांवर काही करारांसह पुढील वर्षांमध्ये अनेक राजदूतांची देवाणघेवाण झाली, परंतु शिवाजीराजांच्या मृत्यूपूर्वी राजापूरची नुकसानभरपाई कधीही भरली गेली नाही. १६८२ च्या अखेरीस तेथील कारखाना विसर्जित झाला.
🏇 *उमराणी आणि नेसरीच्या लढाया*
१६७४ मध्ये, मराठा सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना विजापुरी सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील सैन्याशी लढण्यासाठी पाठवण्यात आले. प्रतापरावांच्या सैन्याने एका मोक्याच्या तलावाला वेढा घालून विजापुरी सैन्याचा पाणीपुरवठा खंडित केला आणि लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्याला पकडले, ज्यामुळे बहलोल खानला शांततेसाठी तह करण्यासाठी भाग पडले. शिवाजीराजांनी आधीच इशारे दिले असतानाही, प्रतापरावांनी बहलोल खानला सोडले. परंतु खानाने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली.
शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना एक नाराजी पत्र पाठवले आणि बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला. आपल्या राजांच्या फटकारामुळे अस्वस्थ झालेल्या प्रतापरावांनी बहलोल खानला शोधून काढले आणि आपले मुख्य सैन्य मागे सोडून फक्त सहा इतर घोडेस्वारांबरोबर मोहीम सुरू केली. परंतु प्रतापराव युद्धात मारले गेले; त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजीराजांना फार दुःख झाले आणि त्यांनी आपला दुसरा मुलगा राजारामचा विवाह प्रतापरावांच्या मुलीशी लावला. प्रतापरावांच्या पश्चात हंबीरराव मोहिते हे नवीन सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) म्हणून नियुक्त झाले. रायगड किल्ला हिरोजी इंदुलकर यांनी नवजात मराठा राज्याची राजधानी म्हणून नव्याने बांधला.
👑 *शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक*
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. इतर मराठा नेत्यांना, ज्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते, त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत होती. याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम प्रदान करू शकत होते.
ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते की सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.
प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, काही वादग्रस्तच समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदूतृ समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता.
प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.
शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते. त्यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षत्रिय आहेत, परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभांची गरज होती. हा दर्जा लागू करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा एक पवित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षत्रियाकडून अपेक्षित वैदिक विधींनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला.
सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे जंगी स्वागत केले.
२८ मे रोजी, शिवरायांनी आपल्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या क्षत्रिय संस्कारांचे इतके दिवस पालन न झाल्यामुळे तपश्चर्या केली. मग त्यांना गागा भट्ट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव, गागा भट्ट यांनी वैदिक मंत्र सोडला आणि शिवाजीराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाच्या सुधारित स्वरूपात दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, शिवरायांनी स्वतःच्या हयातीत जाणूनबुजून किंवा अपघाताने केलेल्या पापांचे प्रायश्चित केले. सोने, चांदी आणि तलम तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी सात धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व धातू व वस्तूंसह एक लाख हूण ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आले. पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. दोन विद्वान ब्राह्मणांनी निदर्शनास आणून दिले की, शिवाजीराजांनी छापे टाकताना, ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला, तसेच शहरे जाळली होती आणि त्यांना या पापातून ८,००० रुपये किंमत देऊन शुद्ध केले जाऊ शकते आणि शिवाजी महाराजांनी ही रक्कम दिली. संमेलनाचे भोजन, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिने यासाठी केलेला एकूण खर्च १.५ दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला.
६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी (त्रयोदशी ) होता. गागा भट्ट यांनी यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. प्रसवल्यानंतर शिवाजीराजांनी आई जिजाबाईंना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते. शिवाजी महाराजांना शककर्ता ("युगाचा संस्थापक") आणि छत्रपती ("सार्वभौम") असे नाव देण्यात आले. त्यांनी हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील घेतली.
राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.
👑 *दुसरा राज्याभिषेक*
१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला; ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी कमी-प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला.
गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.
🚩 *दक्षिण दिग्विजय*
१६७४ च्या सुरुवातीस, मराठ्यांनी आक्रमक मोहीम हाती घेतली. ऑक्टोबरमध्ये खान्देशामध्ये छापे टाकले. तसेच विजापुरी फोंडा (एप्रिल १६७५), कारवार (मध्यवर्षी), आणि कोल्हापूर (जुलै) ताब्यात घेतला. नोव्हेंबरमध्ये, मराठा नौदलाने जंजिरा येथील सिद्दींशी झडप घातली, परंतु त्यांना तिथे अपयश आले. आजारातून बरे झाल्यावर आणि दख्खनी आणि अफगाण यांच्यात विजापूर येथे सुरू झालेल्या गृहयुद्धाचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी एप्रिल १६७६ मध्ये अथणीवर स्वारी केली.
आपल्या मोहिमेच्या धावपळीत शिवाजीराजांनी दख्खनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले, की दक्षिण भारत ही एक मातृभूमी आहे जी बाहेरील लोकांपासून संरक्षित केली पाहिजे. त्यांचे आवाहन काहीसे यशस्वी झाले आणि १६७७ मध्ये शिवाजीराजांनी एका महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोवळकोंडा सल्तनतच्या कुतुबशहाशी करार केला. यामध्ये विजापूरशी आपली युती नाकारण्याचे आणि मुघलांना एकत्रितपणे विरोध करण्यास कुतुबशहाने सहमती दर्शविली.
१६७७ मध्ये, शिवाजीराजांनी ३०,००० घोडदळ आणि ४०,००० पायदळासह आणि गोवळकोंडा तोफखाना आणि निधीच्या मदतीने कर्नाटकवर आक्रमण केले. दक्षिणेकडे जाताना शिवरायांनी वेल्लोर आणि गिंजीचे किल्ले ताब्यात घेतले; यापैकी नंतरचा किल्ला त्यांचे पुत्र राजाराम प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांची राजधानी बनला.
शहाजीनंतर तंजावर येथे राज्य करणाऱ्या त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई (पूर्वाश्रमीच्या मोहिते) आणि शहाजीराजांचा मुलगा आणि शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी पहिला) याच्याशी समेट करण्याचा शिवरायांचा हेतू होता. सुरुवातीला आश्वासक असणाऱ्या वाटाघाटी नंतर अयशस्वी ठरल्या, म्हणून रायगडावर परतताना, शिवाजीराजांनी २६ नोव्हेंबर १६७७ रोजी आपल्या सावत्र भावाच्या सैन्याचा पराभव केला आणि म्हैसूर पठारावरील बहुतेक संपत्ती ताब्यात घेतली.
व्यंकोजीची पत्नी दीपाबाई, जिचा शिवराय मनापासून आदर करत होते, तिने शिवरायांशी नवीन वाटाघाटी केल्या आणि आपल्या पतीला मुस्लिम सल्लागारांपासून दूर राहण्यास पटवून दिले. सरतेशेवटी, शिवाजीराजांनी दीपाबाई आणि त्यांच्या स्त्री वंशजांना त्यांनी ताब्यात घेतलेली अनेक संपत्ती स्वाधीन करण्यास संमती दिली. तसेच वेंकोजीनेही प्रांतांचे योग्य प्रशासन आणि शहाजीराजेंच्या समाधीच्या देखभालीसाठी अनेक अटी मान्य केल्या.
🪔 *मृत्यू आणि उत्तराधिकार*
शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह एक वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते पश्चात्ताप न करता घरी परतले आणि पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले.
हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटीश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि, शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही.
शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले.
⚜️ *राज्यकारभार - अष्टप्रधान* मंडळ अष्टप्रधानमंडळ
शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे.
🏵️ *मराठी आणि संस्कृत भाषा प्रोत्साहन व विकास*
शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती.
🚩 *धर्मविषयक धोरण*
शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले.
💮 *शिवरायांची राजमुद्रा*
राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो."
🤺 *शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र*
शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, जिला ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान, वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या.
🎠 *शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार*
१७५८ मध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना मराठा साम्राज्य
शिवाजी महाराजांनंतर मुघलांसोबत मराठ्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, १६८१ मध्ये, औरंगजेबाने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश, विजापूरस्थित आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ताब्यात घेण्यासाठी दक्षिणेत आक्रमण सुरू केले. या दोन्ही सल्तनतांचा नायनाट करण्यात तो यशस्वी झाला पण दख्खनमध्ये २७ वर्षे घालवूनदेखील तो मराठ्यांना वश करू शकला नाही. या काळात १६८९ मध्ये संभाजीराजांना मुघलांनी पकडले आणि छळ करून त्यांना फाशी दिली. मराठ्यांनी नंतर संभाजीराजांचे उत्तराधिकारी राजाराम आणि नंतर राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रतिकार केला. लढायांमुळे मुघल आणि मराठे यांच्यात प्रदेश वारंवार बदलले गेले.पुढे १७०७ मध्ये मुघलांचा पराभव होऊन हा संघर्ष संपला.
शाहू महाराज, जे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजीराजांचे पुत्र होते, त्यांना औरंगजेबाने २७ वर्षांच्या संघर्षात कैदेत ठेवले होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी शाहूराजेंची सुटका केली. आपल्या काकू ताराबाई यांच्यासोबत वारसाहक्कासाठी अल्पशा सत्ता संघर्षानंतर, शाहूराजांनी १७०७ ते १७४९ पर्यंत मराठा साम्राज्यावर राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर त्यांच्या वंशजांना मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) म्हणून नियुक्त केले. बाळाजींचा मुलगा, पेशवे बाजीराव पहिले आणि नातू, पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यशाच्या शिखरावर असताना मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू पासून उत्तरेला पेशावर (आजचे खैबर पख्तूनख्वा) आणि पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. १७६१ मध्ये, मराठ्यांच्या सैन्याने पानिपतची तिसरी लढाई अफगाण दुर्राणी साम्राज्याच्या अहमद शाह अब्दालीशी गमावली, ज्यामुळे वायव्य भारतात त्यांचा साम्राज्य विस्तार थांबला. पानिपतनंतर दहा वर्षांनी, माधवराव पेशव्यांच्या राजवटीत मराठ्यांनी उत्तर भारतात पुन्हा प्रभाव मिळवला .
मोठ्या साम्राज्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात, शाहूराजे आणि पेशव्यांनी सर्वात बलाढ्य शूरवीरांना अर्ध-स्वायत्तता दिली आणि मराठा संघाची निर्मिती केली. ते बडोद्याचे गायकवाड, इंदूर आणि माळव्याचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया आणि नागपूरचे भोंसले म्हणून ओळखले जाऊ लागले. १७७५ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यातील उत्तराधिकारी संघर्षात हस्तक्षेप केला, ज्याचा परिणाम म्हणजे पहिले इंग्रज-मराठा युद्ध होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात (१८०५-१८१८) इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव होईपर्यंत मराठे भारतातील प्रख्यात सत्ता राहिले. पण या युद्धांनंतर कंपनीला भारतातील बहुतेक भागांत प्रबळ सत्ता मिळाली.
🚩 *जयंती* - *शिव जयंती इतिहास*
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.
ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.
तुकाराम, बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.
आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.(ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.). अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.
छ. शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
🎞️ *चित्रपट*
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. भालजी पेंढारकरांनी छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढलेले आहेत. त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :
गनिमी कावा
छत्रपती शिवाजी
तान्हाजी द अनसंग हीरो
नेताजी पालकर
फत्तेशिकस्त
बहिर्जी नाईक
बाळ शिवाजी
भारत की खोज (हिंदी)
मराठी तितुका मेळवावा
मी शिवाजीराजे भोसले बॊलतोय
राजमाता जिजाऊ (दूरचित्रवाणी मालिका)
राजा शिवछत्रपती (दूरचित्रवाणी मालिका)
वीर शिवाजी (हिंदी वेब सीरीज)
शेर शिवराज है
सरसेनापती हंबीरराव
जय शिवाजी जय भवानी ( दूरचित्रवाणी मालिका)(जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम)
🚩🚩 *हरहर महादेव....* 🚩🚩
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🚩🚩🇮🇳🤴🏻🇮🇳🚩🚩🚩
*छत्रपती शिवाजी महाराज*
*(मराठी साम्राज्याचे संस्थापक)*
पूर्ण नाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
*जन्म : १९ फेब्रुवारी १६३०*
(शिवनेरी किल्ला, महाराष्ट्र)
*मृत्यू : ३ एप्रिल १६८०*
(रायगड किल्ला, महाराष्ट्र)
अधिकारकाळ : ६ जून १६७४ - ३ एप्रिल १६८०
अधिकारारोहण : छत्रपती पदाभिषेक
राज्याभिषेक : ६ जून १६७४
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
राजधानी: रायगड
उत्तराधिकारी : छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील : शहाजीराजे भोसले
आई : जिजाबाई
पत्नी : सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंतीबाई
संतती : छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले,
सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई, राजकुवरबाई, दीपाबाई, कमळाबाई
राजघराणे : भोसले
राजब्रीदवाक्य : 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन : होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)
शिवाजी शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.
प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.
शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.
🤴🏻 *प्रारंभिक जीवन*
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे.
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवाछ केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला.
🌀 *पार्श्वभूमी आणि संदर्भ*
इ.स. १६३६ मध्ये विजापूरच्या आदिल शाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजीराजे त्यावेळीपश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते.
शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले.
१६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १६४७ मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले.
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
♨️ *विजापूर सल्तनतीशी संघर्ष*
इ.स. १६४६ मध्ये, सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती.
यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाईची करण्याचे ठरवले. २५ जुलै १६४८ रोजी, शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले.
१६४९ मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. १६४९ - १६५५ दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि १६५६ मध्ये, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्याच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. १६६४ - १६६५ मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला.
🤺 *अफझलखानाशी लढा*
शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. १६५७ मध्ये सुलतानने, किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने, अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजा भवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली.
विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले.
दोन्ही सैन्याने आपापसांत अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफझलखानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यांनंतर अफझलखानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले.
अफझलखान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती. याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपतलपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील ३,००० हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैदी झाले. विजयानंतर, प्रतापगडच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूंपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीसे देण्यात आली.
अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापुरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
🏰 *पन्हाळ्याचा वेढा*
विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि १६५९ मध्ये रुस्तम जमान आणि फझलखान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. मुघलांशी युती करून १६६० मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जौहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जौहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. १६६० च्या मध्यात सिद्दी जौहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला.
पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जौहरने राजापूर येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडिमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्यांची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांन समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याची बदला घेतला आणि चार इंग्रजांना पकडले व त्यांना १६६३ च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले.
अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटी केल्या आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला; १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला.
💥 *पावनखिंडीची लढाई*
रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला असता, बांदल देशमुखचे मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे हे ३०० सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले. यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याची संधी मिळाली.
पावनखिंडच्या लढाईत लहान मराठा सैन्याने मोठ्या शत्रूला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळी बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले होते तरीही विशाळगडावरून तोफगोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोचल्याचे संकेत होता. घोड खिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे, शिबोसिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावन खिंड ("पवित्र खिंड") असे नामकरण करण्यात आले.
🔥 *मुघल साम्राज्याशी संघर्ष*
१६५७ पर्यंत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी शांततापूर्ण संबंध ठेवले होते. मुघल सम्राटाचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता, तेव्हा त्याला विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली मदत देऊ केली होती. याच्या बदल्यात शिवरायांच्या ताब्यातील विजापुरी किल्ले आणि गावांवर त्यांचा हक्क मान्य करावा, अशी त्यांची इच्छा होती. मुघलांच्या प्रतिसादाने समाधानी झाले नसल्याने आणि विजापूरकडून चांगली ऑफर मिळाल्याने, त्यांनी मुघलांच्या दख्खनवर हल्ला केला. मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च १६५७ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल प्रदेशावर छापा टाकला. यानंतर जुन्नरवर छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांनी 300,000 हून एवढी रोख रक्कम आणि 200 घोडे घेतले. औरंगजेबाने नासिरी खानला पाठवून या छाप्याला उत्तर दिले. नासिरी खानाने अहमदनगर येथे मराठी सैन्याचा पराभव केला. तथापि पावसाळ्यामुळे आणि सम्राट शाहजहानच्या आजारपणानंतर मुघल सिंहासनासाठी भावांसोबतच्या उत्तराधिकारासाठी लढाईमुळे औरंगजेबाला शिवरायांविरुद्धच्या प्रतिकारांमध्ये व्यत्यय आला.
🤺 *शाहिस्तेखान प्रकरण*
आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी १६६० मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी १,५०,००० हून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. खानासोबत सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखालील विजापूरचे सैन्य देखील होते. शाइस्ताखानाने आपल्या ८०,००० इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे ताब्यात घेतले. त्याने जवळचा चाकणचा किल्लाही घेतला. किल्ल्याच्या भिंतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेढा घातला होता. शाइस्ताखानने मोठे, चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले.
५ एप्रिल १६६३ च्या रात्री शिवरायांनी शाईस्ताखानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला. लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन ४०० माणसांसह शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या शयनगृहात घुसले. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या हल्ल्यात शाइस्ता खानचा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नोकर आणि सैनिक मारले गेले. खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये बदली केली.
शाइस्ताखानाच्या हल्ल्यांचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेला खजिना भरून काढण्यासाठी १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लूटले.
💰 *सुरतेची पहिली लूट*
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
🏳️ *पुरंदरचा तह*
शाहिस्तेखान आणि सुरतेवरील हल्ल्यांमुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे १५,००० सैन्यासह पाठवले. १६६५ मध्ये, जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंगच्या घोडदळांनी ग्रामीण भाग उद्ध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्ल्यांना वेढे घातले. हा मुघल सेनापती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतींना आणि त्यांच्या अनेक घोडदळांना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला. १६६५ च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगशी करार करणे भाग पडले.
११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात, शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले, १२ स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना ४,००,००० सोन्याचे हूण इतकी भरपाई दिली. शिवरायांनी मुघल साम्राज्याचा जामीनदार बनण्यास आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारांसह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्यासाठी मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शविली.
🏰 *आग्रा भेट*
शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात
१६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले (काही दस्ताऐवजांनुसार दिल्लीमध्ये बोलावले होते.) मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि, दरबारात १२ मे १६६६ रोजी, शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले. यापैकी काहींना त्यांनी युद्धात आधीच पराभूत केले होते. शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले. यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग याने शिवाजी आणि त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्याची हमी दिली.
शिवाजी महाराजांसाठी नजरकैदेत असलेली स्थिती धोक्याची होती, कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता. जयसिंगने शिवाजीराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते. म्हणून त्याने औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवाजीराजांनी स्वतःला मुक्त करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी परत पाठवले आणि रामसिंगला त्याने सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितली आणि स्वतःला मुघल सैन्याच्या स्वाधीन केले. तेव्हा शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गरिबांना प्रायश्चित्त म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात. पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः एका मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले.
कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
🔮 *मुघलांसोबत शांतता*
शिवरायांच्या सुटकेनंतर मुघल सरदार जसवंत सिंग याने नवीन शांतता प्रस्तावासाठी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यानंतर मुघलांशी शत्रुत्व कमी झाले. १६६६ ते १६६८ दरम्यान, औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केली. तसेच संभाजीला पुन्हा एकदा ५,००० घोड्यांसह मुघल मनसबदार करण्यात आले. त्यावेळी शिवाजीराजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासमवेत औरंगाबाद येथे मुघल सुभेदार मुअज्जम (पहिला बहादूरशहा) याच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले. संभाजीला बेरारमध्ये महसूल वसुलीसाठी प्रदेश देण्यात आला.
औरंगजेबाने शिवाजीराजांना कमजोर होत चाललेल्या आदिलशाहीवर हल्ला करण्याची परवानगी दिली; कमकुवत झालेला सुलतान अली आदिल शाह दुसरा याने शांततेसाठी प्रस्ताव दिला आणि शिवाजी महाराजांना सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकार दिले.
🚩 *पुनर्विजय*
शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील शांतता १६७० पर्यंत टिकली. त्या वेळी औरंगजेबाला शिवाजीराजे आणि मुअज्जम यांच्यातील घनिष्ट संबंधांबद्दल संशय आला, जो त्याचे सिंहासन बळकावू शकेल असे त्याला वाटले. तो शिवाजीराजांकडून लाचही घेत असावा, असाही औरंगजेबाला संशय होता तसेच त्या वेळी, औरंगजेबाने अफगाणांशी लढाई केली. त्यासाठी त्याने दख्खनमधील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी केले; परिणामी बरखास्त झालेले बरेच सैनिक मराठ्यांच्या सेवेत त्वरीत रुजू झाले. मुघलांनी काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बेरारची जहागीरही काढून घेतली. प्रत्युत्तर म्हणून शिवाजीराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमण सुरू केले आणि चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना शरण आलेल्या प्रदेशाचा एक मोठा भाग परत मिळवला.
१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लूटले. यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांचा हल्ला परतवून लावू शकले, परंतु मक्केहून परत आलेल्या मावरा-उन-नाहर येथील मुस्लिम राजपुत्राचा माल लुटण्यासह त्यांनी शहरच उद्ध्वस्त केले. नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या मुघलांनी मराठ्यांशी पुन्हा शत्रुत्व सुरू केले. मुघलांनी शिवाजीराजांना सुरतहून घरी परतल्यावर अडवण्यासाठी दाऊद खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले; परंतु सध्याच्या नाशिकजवळील वणी-दिंडोरीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला.
ऑक्टोबर १६७० मध्ये, शिवाजीराजांनी आपले सैन्य मुंबईत इंग्रजांना त्रास देण्यासाठी पाठवले. कारण इंग्रजांनी त्यांना युद्धसामग्री विकण्यास नकार दिला होता. त्यांच्या सैन्याने लाकूड तोडणाऱ्या इंग्रज लोकांना मुंबई सोडण्यापासून रोखले. सप्टेंबर १६७१ मध्ये, शिवाजीराजांनी दांडा-राजपुरी विरुद्धच्या लढाईसाठी पुन्हा एकदा साहित्य मागवण्यासाठी मुंबईत राजदूत पाठवले. या विजयामुळे मराठ्यांना किती फायदे होतील याची इंग्रजांना शंका होती, परंतु राजापूरचे कारखाने लुटल्याची भरपाई मिळण्याची एकही संधी ते गमावू इच्छित नव्हते. इंग्रजांनी लेफ्टनंट स्टीफन उस्टिकला शिवाजीशी बोलणी करण्यासाठी पाठवले, परंतु राजापूर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर वाटाघाटी अयशस्वी झाल्या. १६७४ मध्ये शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यांवर काही करारांसह पुढील वर्षांमध्ये अनेक राजदूतांची देवाणघेवाण झाली, परंतु शिवाजीराजांच्या मृत्यूपूर्वी राजापूरची नुकसानभरपाई कधीही भरली गेली नाही. १६८२ च्या अखेरीस तेथील कारखाना विसर्जित झाला.
🏇 *उमराणी आणि नेसरीच्या लढाया*
१६७४ मध्ये, मराठा सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना विजापुरी सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील सैन्याशी लढण्यासाठी पाठवण्यात आले. प्रतापरावांच्या सैन्याने एका मोक्याच्या तलावाला वेढा घालून विजापुरी सैन्याचा पाणीपुरवठा खंडित केला आणि लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्याला पकडले, ज्यामुळे बहलोल खानला शांततेसाठी तह करण्यासाठी भाग पडले. शिवाजीराजांनी आधीच इशारे दिले असतानाही, प्रतापरावांनी बहलोल खानला सोडले. परंतु खानाने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली.
शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना एक नाराजी पत्र पाठवले आणि बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला. आपल्या राजांच्या फटकारामुळे अस्वस्थ झालेल्या प्रतापरावांनी बहलोल खानला शोधून काढले आणि आपले मुख्य सैन्य मागे सोडून फक्त सहा इतर घोडेस्वारांबरोबर मोहीम सुरू केली. परंतु प्रतापराव युद्धात मारले गेले; त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजीराजांना फार दुःख झाले आणि त्यांनी आपला दुसरा मुलगा राजारामचा विवाह प्रतापरावांच्या मुलीशी लावला. प्रतापरावांच्या पश्चात हंबीरराव मोहिते हे नवीन सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) म्हणून नियुक्त झाले. रायगड किल्ला हिरोजी इंदुलकर यांनी नवजात मराठा राज्याची राजधानी म्हणून नव्याने बांधला.
👑 *शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक*
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. इतर मराठा नेत्यांना, ज्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते, त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत होती. याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम प्रदान करू शकत होते.
ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते की सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.
प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, काही वादग्रस्तच समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदूतृ समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता.
प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.
शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते. त्यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षत्रिय आहेत, परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभांची गरज होती. हा दर्जा लागू करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा एक पवित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षत्रियाकडून अपेक्षित वैदिक विधींनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला.
सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे जंगी स्वागत केले.
२८ मे रोजी, शिवरायांनी आपल्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या क्षत्रिय संस्कारांचे इतके दिवस पालन न झाल्यामुळे तपश्चर्या केली. मग त्यांना गागा भट्ट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव, गागा भट्ट यांनी वैदिक मंत्र सोडला आणि शिवाजीराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाच्या सुधारित स्वरूपात दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, शिवरायांनी स्वतःच्या हयातीत जाणूनबुजून किंवा अपघाताने केलेल्या पापांचे प्रायश्चित केले. सोने, चांदी आणि तलम तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी सात धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व धातू व वस्तूंसह एक लाख हूण ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आले. पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. दोन विद्वान ब्राह्मणांनी निदर्शनास आणून दिले की, शिवाजीराजांनी छापे टाकताना, ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला, तसेच शहरे जाळली होती आणि त्यांना या पापातून ८,००० रुपये किंमत देऊन शुद्ध केले जाऊ शकते आणि शिवाजी महाराजांनी ही रक्कम दिली. संमेलनाचे भोजन, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिने यासाठी केलेला एकूण खर्च १.५ दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला.
६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी (त्रयोदशी ) होता. गागा भट्ट यांनी यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. प्रसवल्यानंतर शिवाजीराजांनी आई जिजाबाईंना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते. शिवाजी महाराजांना शककर्ता ("युगाचा संस्थापक") आणि छत्रपती ("सार्वभौम") असे नाव देण्यात आले. त्यांनी हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील घेतली.
राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.
👑 *दुसरा राज्याभिषेक*
१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला; ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी कमी-प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला.
गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.
🚩 *दक्षिण दिग्विजय*
१६७४ च्या सुरुवातीस, मराठ्यांनी आक्रमक मोहीम हाती घेतली. ऑक्टोबरमध्ये खान्देशामध्ये छापे टाकले. तसेच विजापुरी फोंडा (एप्रिल १६७५), कारवार (मध्यवर्षी), आणि कोल्हापूर (जुलै) ताब्यात घेतला. नोव्हेंबरमध्ये, मराठा नौदलाने जंजिरा येथील सिद्दींशी झडप घातली, परंतु त्यांना तिथे अपयश आले. आजारातून बरे झाल्यावर आणि दख्खनी आणि अफगाण यांच्यात विजापूर येथे सुरू झालेल्या गृहयुद्धाचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी एप्रिल १६७६ मध्ये अथणीवर स्वारी केली.
आपल्या मोहिमेच्या धावपळीत शिवाजीराजांनी दख्खनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले, की दक्षिण भारत ही एक मातृभूमी आहे जी बाहेरील लोकांपासून संरक्षित केली पाहिजे. त्यांचे आवाहन काहीसे यशस्वी झाले आणि १६७७ मध्ये शिवाजीराजांनी एका महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोवळकोंडा सल्तनतच्या कुतुबशहाशी करार केला. यामध्ये विजापूरशी आपली युती नाकारण्याचे आणि मुघलांना एकत्रितपणे विरोध करण्यास कुतुबशहाने सहमती दर्शविली.
१६७७ मध्ये, शिवाजीराजांनी ३०,००० घोडदळ आणि ४०,००० पायदळासह आणि गोवळकोंडा तोफखाना आणि निधीच्या मदतीने कर्नाटकवर आक्रमण केले. दक्षिणेकडे जाताना शिवरायांनी वेल्लोर आणि गिंजीचे किल्ले ताब्यात घेतले; यापैकी नंतरचा किल्ला त्यांचे पुत्र राजाराम प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांची राजधानी बनला.
शहाजीनंतर तंजावर येथे राज्य करणाऱ्या त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई (पूर्वाश्रमीच्या मोहिते) आणि शहाजीराजांचा मुलगा आणि शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी पहिला) याच्याशी समेट करण्याचा शिवरायांचा हेतू होता. सुरुवातीला आश्वासक असणाऱ्या वाटाघाटी नंतर अयशस्वी ठरल्या, म्हणून रायगडावर परतताना, शिवाजीराजांनी २६ नोव्हेंबर १६७७ रोजी आपल्या सावत्र भावाच्या सैन्याचा पराभव केला आणि म्हैसूर पठारावरील बहुतेक संपत्ती ताब्यात घेतली.
व्यंकोजीची पत्नी दीपाबाई, जिचा शिवराय मनापासून आदर करत होते, तिने शिवरायांशी नवीन वाटाघाटी केल्या आणि आपल्या पतीला मुस्लिम सल्लागारांपासून दूर राहण्यास पटवून दिले. सरतेशेवटी, शिवाजीराजांनी दीपाबाई आणि त्यांच्या स्त्री वंशजांना त्यांनी ताब्यात घेतलेली अनेक संपत्ती स्वाधीन करण्यास संमती दिली. तसेच वेंकोजीनेही प्रांतांचे योग्य प्रशासन आणि शहाजीराजेंच्या समाधीच्या देखभालीसाठी अनेक अटी मान्य केल्या.
🪔 *मृत्यू आणि उत्तराधिकार*
शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह एक वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते पश्चात्ताप न करता घरी परतले आणि पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले.
हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटीश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि, शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही.
शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले.
⚜️ *राज्यकारभार - अष्टप्रधान* मंडळ अष्टप्रधानमंडळ
शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे.
🏵️ *मराठी आणि संस्कृत भाषा प्रोत्साहन व विकास*
शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती.
🚩 *धर्मविषयक धोरण*
शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले.
💮 *शिवरायांची राजमुद्रा*
राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला. या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो."
🤺 *शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र*
शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, जिला ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान, वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या.
🎠 *शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार*
१७५८ मध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना मराठा साम्राज्य
शिवाजी महाराजांनंतर मुघलांसोबत मराठ्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, १६८१ मध्ये, औरंगजेबाने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश, विजापूरस्थित आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ताब्यात घेण्यासाठी दक्षिणेत आक्रमण सुरू केले. या दोन्ही सल्तनतांचा नायनाट करण्यात तो यशस्वी झाला पण दख्खनमध्ये २७ वर्षे घालवूनदेखील तो मराठ्यांना वश करू शकला नाही. या काळात १६८९ मध्ये संभाजीराजांना मुघलांनी पकडले आणि छळ करून त्यांना फाशी दिली. मराठ्यांनी नंतर संभाजीराजांचे उत्तराधिकारी राजाराम आणि नंतर राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रतिकार केला. लढायांमुळे मुघल आणि मराठे यांच्यात प्रदेश वारंवार बदलले गेले.पुढे १७०७ मध्ये मुघलांचा पराभव होऊन हा संघर्ष संपला.
शाहू महाराज, जे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजीराजांचे पुत्र होते, त्यांना औरंगजेबाने २७ वर्षांच्या संघर्षात कैदेत ठेवले होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी शाहूराजेंची सुटका केली. आपल्या काकू ताराबाई यांच्यासोबत वारसाहक्कासाठी अल्पशा सत्ता संघर्षानंतर, शाहूराजांनी १७०७ ते १७४९ पर्यंत मराठा साम्राज्यावर राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर त्यांच्या वंशजांना मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) म्हणून नियुक्त केले. बाळाजींचा मुलगा, पेशवे बाजीराव पहिले आणि नातू, पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यशाच्या शिखरावर असताना मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू पासून उत्तरेला पेशावर (आजचे खैबर पख्तूनख्वा) आणि पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. १७६१ मध्ये, मराठ्यांच्या सैन्याने पानिपतची तिसरी लढाई अफगाण दुर्राणी साम्राज्याच्या अहमद शाह अब्दालीशी गमावली, ज्यामुळे वायव्य भारतात त्यांचा साम्राज्य विस्तार थांबला. पानिपतनंतर दहा वर्षांनी, माधवराव पेशव्यांच्या राजवटीत मराठ्यांनी उत्तर भारतात पुन्हा प्रभाव मिळवला .
मोठ्या साम्राज्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात, शाहूराजे आणि पेशव्यांनी सर्वात बलाढ्य शूरवीरांना अर्ध-स्वायत्तता दिली आणि मराठा संघाची निर्मिती केली. ते बडोद्याचे गायकवाड, इंदूर आणि माळव्याचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया आणि नागपूरचे भोंसले म्हणून ओळखले जाऊ लागले. १७७५ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यातील उत्तराधिकारी संघर्षात हस्तक्षेप केला, ज्याचा परिणाम म्हणजे पहिले इंग्रज-मराठा युद्ध होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात (१८०५-१८१८) इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव होईपर्यंत मराठे भारतातील प्रख्यात सत्ता राहिले. पण या युद्धांनंतर कंपनीला भारतातील बहुतेक भागांत प्रबळ सत्ता मिळाली.
🚩 *जयंती* - *शिव जयंती इतिहास*
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.
ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.
तुकाराम, बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.
आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.(ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.). अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.
छ. शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
🎞️ *चित्रपट*
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. भालजी पेंढारकरांनी छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढलेले आहेत. त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :
गनिमी कावा
छत्रपती शिवाजी
तान्हाजी द अनसंग हीरो
नेताजी पालकर
फत्तेशिकस्त
बहिर्जी नाईक
बाळ शिवाजी
भारत की खोज (हिंदी)
मराठी तितुका मेळवावा
मी शिवाजीराजे भोसले बॊलतोय
राजमाता जिजाऊ (दूरचित्रवाणी मालिका)
राजा शिवछत्रपती (दूरचित्रवाणी मालिका)
वीर शिवाजी (हिंदी वेब सीरीज)
शेर शिवराज है
सरसेनापती हंबीरराव
जय शिवाजी जय भवानी ( दूरचित्रवाणी मालिका)(जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम)
कॉम्प्युटर माहितीवर आधारित टेस्ट
कॉम्प्युटर MCQ टेस्ट कॉम्प्युटर MCQ टेस्ट 1. CPU च...